दादू : काही निरीक्षणे

दादू मांद्रेकर यांची कविता गोव्यातील दलित कवितेचे उदाहरण म्हणून समोर येते. ‘शापित सूर्य’ हा त्यांचा कवितासंग्रह 1991 साली प्रकाशित झाला. गेल्या 19 वर्षांत मांद्रेकर यांनी आपले व्यक्तिमत्व टोकदारपणे घडवले आहे. पत्रकार, कवी, लेखक, विचारशील अभ्यासक, अभिनव छायाचित्रकार, अभिजात नर्तक, कृतिशील आंबेडकरवादी कार्यकर्ता  व प्रजासत्ताक या घटनाविषयक विचारकालिकाचे संपादक अशा अनेक अंगांनी त्यांनी स्वत:ला घडविले आहे.
आंबेडकरवादाचा प्रसार दादूने गोव्यात केला. 1998 मध्ये त्यांनी दोन दिवसांचे आंबेडकर विचार संमेलन भरविले. डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. अरूण कांबळे, गंगाधर पानतावणे यांच्या परिवर्तनवादी विचारांनी गोव्यात नवचैतन्य निर्माण झाले. बौद्ध धम्माची दीक्षा दादूने घेतली. परन्तु गोव्यात आपण एकटे पडत असल्याची त्याची भावना आहे. कविता कुणाला वाचून दाखवायची आहे, असा प्रश्‍न दादू समोर पडणे साहजिक आहे. ‘शापित सूर्य’ या त्यांच्या संग्रहात सांस्कृतिक संघर्ष चित्रित झालेला दिसतो.
- नरेंद्र बोडके
(गोमंतकीय मराठी कवितेचे अर्धशतक, संपा. नरेंद्र बोडके, 2010, प्रका. नंदिनी तांबोळी, पुणे)